औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्यातील ठाकरे सरकार हे बेईमानी करून सत्तेवर आलेले सरकार आहे. सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. यावर आता बोलणं योग्य होणार नाही. मात्र, यापुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळी शपथ घेतली जाईल, असे सूचक विधान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथ घेऊन  सरकार स्थापन केले होते. त्या घटनेला आज (सोमवार) एक वर्ष पूर्ण होत आहे. यावरून सत्ताधारी नेत्यांनी फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात. तसेच ज्या दिवशी सरकार पडेल, त्या दिवशी राज्यात दुसरे सरकार देऊ, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.