कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसाच्या तुलनेत गेल्या पाच दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या काही अंशी कमी झाली आहे. दरम्यान, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासशासह आरोग्य प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळाला आहे. 

शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या तासागणिक सुपरफास्ट वेगाने वाढत होती. तर कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याने ते हतबल झाले होते. तसेच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, गेल्या पाच दिवसामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून कोरोनामुक्त होण्याच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसामध्ये २२२१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३६५८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकंदर सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होवून कोरोनावर मात केलेल्यांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळाला आहे.

शासनाच्या नियमांचे पालन करावे

जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे  नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन काळजी घेणे आवश्यक आहे. माझे कुटुंब – माझी जबाबदारी चा अवलंब करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य प्रशासशाकडून करण्यात येत आहे.