मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षकांसाठी दिलासा देणारे वृत्त आहे. राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे ४० हजार शिक्षकांची पदं रिक्त असून ती भरण्यासाठी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी ४० हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. दोन वर्षांनंतर ही परीक्षा होणार आहे. याआधी २०१८-१९ मध्ये शेवटची परीक्षा घेण्यात आली होती. पहिली ते चौथी आणि आणि पाचवी ते आठवी इयत्तेसाठीच्या शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य असणार आहे.