कागल (प्रतिनिधी) : १०२ व्या घटना दुरूस्ती कायद्यात राज्यांना एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचे अधिकार देण्यासंबंधी केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रत्येकवेळी प्रमाणे आत्ता केंद्राकडे बोट दाखवू नये. कोणतीही पळवाट न काढता आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच केंद्र सरकारने घेतलेल्या घटना दुरुस्तीच्या निर्णयामुळे मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राज्यांना मिळणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयाबदल केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, आता मराठा समाजातील विशेषकरून सत्तेतील नेत्यांची आणि मंत्र्यांची विशेष जबाबदारी आहे. त्यांनी आता कोणतेही कारण पुढे करू नये. अन्यथा त्यांची मराठा समाजाची गाठ आहे हे लक्षात ठेवावे. परंतु, आत्तापासूनच काही जणांनी नाहीचा पाढा वाचायला सुरूवात केली आहे. त्यांनी नकारघंटेचा सूर सोडावा ?  आणि आरक्षण देण्याबाबत इच्छाशक्ती दाखवावी. ज्या मराठा समाजाच्या जीवावर तुम्ही सत्ता भोगता त्याच समाजाला जर न्याय देण्याची कुवत नसेल तर खुर्च्या रिकाम्या करा, अशी टिकाही केली.

तसेच मराठा समाजाने आता कुणावरही विसबूंन न राहता स्वतः नेतृत्व करावे. मराठा समाजाच्या भावनांशी खेळणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नये. मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून या लढाईत आरक्षण मिळेपर्यंत मी समाजासोबत ठामपणे राहणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले.