गगनबावडा (प्रतिनिधी) : गेल्या ४० वर्षांपूर्वीपासून कायम रहिवासी असणाऱ्या निवडे ता. गगनबावडा ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीतील घरे काढण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या कार्यवाहीच्या निषेधार्थ व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या अन्यायग्रस्त मिळकतधारकांनी आगामी ग्रा.पं. निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन गगनबावडा तहसीलदारांना मोर्चाद्वारे जाऊन शुक्रवारी निवेदन देण्यात येणार आहे.

निवडे ग्रामपंचायत हद्दीत १९८० पासून बेघर वसाहत स्थापन झाली आहे. येथील नागरिकांना शासनाच्या आदेशाने घर बांधकामासाठी प्लॉट मंजूर करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीने त्यांचा घरफाळा आकारून वीज, पाणी व इतर नागरी सुविधा पुरविल्या आहेत; परंतु अतिक्रमण असल्याबाबत कधीही नोटीस दिली नाही. शासनाच्या परिपत्रकानुसार सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियामानुकुल करण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीने केलेली नाही. ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील मिळकतधारकांना घरे काढण्याच्या नोटीसा लागू केल्या आहेत.

या निवेदनावर विनायक सणगर, माजी उपसरपंच संजय सुतार, श्रीकांत पाटील, बाळू शेटे, मनोज सूर्यवंशी, ग्रा.पं. सदस्या संगीता पोवार, माजी उपसरपंच दिलीप राऊत, संजय लोखंडे, बाळू कुंभार, सलीम मालकापुरे, रिहाना मुल्ला, अलका खाटकी यांच्या सह्या आहेत.