कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकत्याच जिल्ह्यातील ४८३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. निकालानंतर आता सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले आहे. सरपंचपदाच्या आरक्षणासाठी २७ जानेवारीला आरक्षण काढण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले आहेत.

अतिशय चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काही गावांमध्ये स्पष्ट बहुमत कुठल्याच पक्ष वा आघाडीला मिळालेले नाही. बहुमतासाठी एक-दोन जागांचा किरकोळ फरक असलेल्या गावांत अपक्षांना आपल्याकडे ओढण्याकरिता चांगल्याच ऑफर देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सरपंचपदाची लॉटरी २७ जानेवारीला फुटणार आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी पडणार हे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा चुरस वाढणार आहे. सरपंचपदासाठीच्या हालचालींना गती येणार आहे.