मुंबई (प्रतिनिधी) : न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे केव्हाच जाऊन पोहोचले आहे. देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे, याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही, असे म्हणत शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला  आहे.

गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यायमूर्ती शहा उपस्थित होते. यावेळी या दोघांनी एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव केला होता. यावरून शिवसेनेने अग्रलेखातून न्यायव्यवस्था आणि मोदीबाबत भाष्य केले आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे चैतन्यमूर्ती तसेच द्रष्टे नेते असल्याची स्तुतिसुमने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी उधळली आहेत. त्यावर कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मोदी यांनीही लगेच परतफेड करून टाकली आहे. त्यामुळे कुणाला शंका वगैरे घेण्याचे कारण नाही. न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे केव्हाच जाऊन पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायमूर्ती निवृत्तीनंतर गाडी, घोडा, बंगल्याची सोय व्हावी, म्हणून आधीपासूनच खुंटा बळकट करीत असतात व त्यापैकी अनेकांना त्याचे फळ मिळत असते, असेही म्हटले आहे.