नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर व्ही नारायणसामी यांचे सरकार संकटात आल्यानंतर आज (सोमवार) सरकारला बहुमत सिद्ध करावे लागले. काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी १ आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरले होते. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर ७ जागा रिक्त आहेत. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचे सरकार कोसळले आहे.

दरम्यान, व्ही नारायणसामी यांनी पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली आहे. नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पराभव झाला. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले होते. अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर केले.