औरंगाबाद (प्रतिनिधी) : शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर १६ सदस्यांची नेमणूक विश्वस्त मंडळात करण्यात आली होती; मात्र हे विश्वस्त नियमाला धरून नसल्याने त्याचा आक्षेप याचिकाकर्ते उत्तमराव शेळके यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यानंतर आज या प्रकरणाचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्तीचे  आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत. पुढील दोन महिन्यांत नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचेही कोर्टाने सांगितले आहे. तोपर्यंत साई संस्थानचे कामकाज त्रिसदस्यीय समिती पाहणार आहे.

जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि साईबाबा संस्थानेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या तिघांनी दोन महिने हा कारभार पाहायचा आहे; मात्र हा कारभार पाहताना त्यांनी कुठलेही आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घ्यायचे नाही, असे देखील कोर्टाने बजावले आहे. त्यामुळे आता आघाडी सरकारने नेमले विश्वस्त बरखास्त झाल्याने शिंदे सरकार नवीन विश्वस्त मंडळ कधी नेमणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.