मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना विषाणुच्या ओमायक्रॉन व्हेरियंटसंबंधी लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. असा आरोप करून लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ते आज (शुक्रवार) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले की, ओमायक्रॉनसंबंधी लोकांमध्ये फार दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे, असे माझं स्पष्ट मत आहे. म्युकरमायकोसिसची जितकी तीव्रता होती किंवा जेवढं नुकसान होत होतं. तसं यात काही नाही. राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणे हे सरकारचे काम आहे. मुख्यमंत्री याबाबत संवेदनशील आहेत. मुख्यमंत्री तज्ज्ञांशी चर्चा करत असून दोन दिवसांमध्ये नियमावलीसंबंधी निर्णय होईल. तरी लोकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले आहे.