साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यात शेती आणि घरांचे महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. याचे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सांगशी सैतवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गगनबावडा तहसिलदार संगमेश कोडे यांना देण्यात आले.

गगनबावडा तालुक्यातील २० ते २५ गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रापंचिक साहित्यांचे, घरांचे आणि शेतीचे महापूरामुळे नुकसान झाले आहे. तर बऱ्याच ठिकाणी भुस्खलनच्या घटना घडून शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला असून त्यांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामध्ये शेणवडे, मांडूकली, अंदूर रस्ता येथील भुस्खलनामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान झाले आहे. याबाबत याचे तात्काळ पंचनामे करण्यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी ग्रा.पं. सदस्य राजेंद्र कांबळे, विशाल पडवळ, संजय कांबळे, मनोहर बोरये आदी उपस्थित होते.