मुंबई (प्रतिनिधी) : झाले गेलेले सर्व विसरून बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेंना सोडून एकत्र या, आपण भाजपसोबत आघाडी करू, अशी ऑफर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली होती, असा दावा शिंदे गटाचे  प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

या ऑफरला भाजप आणि आम्ही ५० आमदार तयार नव्हतो. कारण हे सर्व योग्य ठरले नसते, असे दीपक केसरकरांनी सांगितले. शिवसेना एकत्र राहावी यासाठी आमच्याकडून अनेक प्रयत्न करण्यात आले; मात्र उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेतील नंबर दोनच्या माणसाला बाजूला सारा आणि तेही केवळ भाजपसोबत युती करावी म्हणतोय म्हणून हे सर्व अतिशय चुकीचे असल्याचे मत व्यक्त करत दीपक केसरकरांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

सुशांत सिंग प्रकरणारत नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. भाजपच्या बहुतांश आमदारांचा याला विरोध होता. मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. एखाद्या तरुणाची बदनामी झाली तर त्याच्या राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची चर्चा सुरू होती, यातून कुटुंबप्रमुख कसा असावा हे पंतप्रधानानी दाखवून दिले होते. त्यांच्या मनात बाळासाहेबांच्या आदर हा दिसून येत होते. यातून उद्धव ठाकरे पदाचा त्याग करणार होते. मात्र कार्यकर्त्यांना हे सांगावे यासाठी खूप वेळ गेला. यातच १२ जणांचे निलंबन करण्यात आल्याने भाजप नाराज झाल्याचेही दीपक केसरकरांनी सांगितले.