मुंबई (प्रतिनिधी) : भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत १२ रुग्ण दगावले… ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं !,  असा निशाणा भाजपने शिवसेनेवर साधला.

भंडारा ते भांडुप… राज्यात सगळीकडेच रुग्णालयांना आगीचा धोका आहे. फक्त मुंबईपुरता विचार केला, तरी अशा धोकादायक रुग्णालयांची संख्या तब्बल ७६२ आहे. महापालिकेच्याच फायर ऑडिटमधली ही माहिती तुमच्यापर्यंत आली आहे का ठाकरे सरकार…?, असा सवालदेखील भाजपने केला आहे.

भांडुप पश्चिमेकडील एल.बी.एस. मार्गावरील ‘ड्रीम्स मॉल’मध्ये गुरुवारी मध्यरात्री आग लागली. येथे असलेल्या कोरोना रुग्णालयातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला.  अग्निप्रतिबंधक अटींची पूर्तता न करताच मॉलमध्ये हे रुग्णालय उभारले होते. भाजपने या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.