मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालायने ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश न्यायालयाने एमएमआरडीएला दिले असून भूखंडाची स्थिती आहे, तशीच ठेवण्यास सांगितले आहे. तसेच जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज (बुधवार) सुनावणी झाली. तर याप्रकरणी अंतिम सुनावणी  फेब्रुवारी महिन्यांत घेण्यात येणार आहे.

यावेळी सरकारने निर्णय मागे घेण्याची आणि संबंधित पक्षकारांना नव्याने सुनावणी देण्याची तयारी दाखवली. पण कारशेडचे काम सुरू ठेवू देण्याची विनंती केली. केंद्र सरकार आणि हस्तक्षेप याचिका करणाऱ्याने विरोध दर्शवल्यानंतर सरकारने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. आणि जागा हस्तांतरणाच्या निर्णयाला स्थगिती देत कारशेडच्या कामालाही स्थगिती दिली आहे.