मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही मदत तत्काळ बाधीतांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागानी दक्षता घावी, अशा सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या घरांच्या आणि मालमत्तेचेही अतोनात नुकसान झाले होते.
नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप विभागांनुसार पुढीलप्रमाणे होणार आहे. पुणे विभागासाठी १५० कोटी १२ लाख रुपये, कोकण विभागासाठी ८ कोटी ५१ लाख रुपये, अमरावती विभागासाठी ११८ कोटी ४१ लाख रुपये, नाशिक विभागासाठी १ लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी ७७ कोटी ९७ लाख रुपये, नागपूर विभागासाठी १० कोटी ६५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.