कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यात रविवारपासून दि. ९ मे ते १९ मे पर्यंत दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. ज्या तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहेत, त्या तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जनता कर्फ्यू अत्यंत कडक करून कुणालाही बाहेर पडू देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.

ना. मुश्रीफ म्हणाले की,  या दहा दिवसांच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप फक्त अत्यावश्यक सेवांना देण्यासाठी सकाळीच सुरू राहतील. तालुक्यातील कसबा सांगाव, मौजे सांगाव, व्हन्नुर व वंदूर या गावांमध्ये बाधितांची संख्या जास्त आहे. या गावांना रेड अलर्ट एरिया जाहीर करून अँटीजन आणि आरटीपीसीआर टेस्टसह लसीकरणही वाढवा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच  तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी लवकरच कागलमध्ये ऑक्सिजन प्रकल्प आणि एचआरसीटी स्कॅन यंत्रणाही कार्यान्वित करणार असल्याचे ना. मुश्रीफ यांनी सांगितले.

तसेच कोरोणा लक्षणाचा पेशंट आल्यास खासगी डॉक्टरांनीही तात्काळ त्याला चाचणी करण्याचा सल्ला द्यावा. तसेच ही माहिती तात्काळ शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी. अन्यथा खाजगी डॉक्टरांवरही कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

बैठकीला प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, डॉ. नवनाथ मगदूम, डॉ. अमर पाटील, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे आदी उपस्थित होते.