कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील तळेवाडी, शाहूवाडी तालुक्यातील गिरगाव आणि शिरोळ तालुक्यातील शिरटी, मजरेवाडी  येथील सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठीच राखीव राहिले. या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (सोमवार) झालेल्या सुनावणीवेळी फेटाळून लावल्या. 

या ग्रामपंचायतींचे सरपंच पद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित करण्यात आले होते. त्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर आज जिल्हाधिकारी देसाई यांचेसमोर सुनावणी झाली. तळेवाडीतील सर्वसाधारण आरक्षणविरोधात सदस्य लक्ष्मीबाई सुतार, शिरोळ तालुक्यातील शिरटीतील आरक्षणविरोधात सदस्य रामदास भंडारे, कुमार रोजे यांनी, मजरेवाडीतील आरक्षणविरोधात सदस्य किशोर जुगळे, लक्ष्मण चौगुले यांनी तर गिरगाव सर्वसाधारण महिला आरक्षणविरोधात सदस्य रामचंद्र घुरके यांनी याचिका दाखल केली होती. या सर्व याचिका जिल्हाधिकारी देसाई यांनी फेटाळून लावल्या.

यामुळे महसूल प्रशासनाने पूर्वी सरपंच पदासाठी राबवलेली प्रक्रिया बरोबर असल्याचाही निष्कर्ष निकालपत्रात काढण्यात आला आहे.