जळगाव : पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करत महाविकास आघाडीतील आमदारांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. या घोषणांनी घायाळ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून पलटवार करण्याचा प्रयत्न आला. आता याच घोषणेवरून राष्ट्रवादी राज्यभरात रान उठवण्याची शक्यता निर्माण झाली असून, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीतच पदाधिकाऱ्यांनी याबाबत मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली. ‘५० खोके, एकदम ओके’ अशा आशयाचे टी शर्ट छापून त्याचे प्रत्येक मतदारसंघात वाटप करण्यात यावे, अशा सूचना राष्ट्रवादीच्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. या सूचनांचे जयंत पाटील यांनी कौतुक करत अशा पद्धतीनेच स्थानिक पातळीवर रान पेटवायला सुरुवात केली पाहिजे, असे आवाहन केले आहे. आजी-माजी सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले तर राज्याचे चित्र बदलू शकते, असेही जयंत पाटील म्हणाले.