कोल्हापूर (प्रतिनिधी)  :  खंडणीचे पैसे देत नसल्याच्या रागातून  एका हॉटेल व्यावसायिकावर तीन फाळकूटदादांनी तलवार हल्ला करून गंभीर जखमी केले.  ही घटना आज (शनिवार) दुपारी कोल्हापुरातील अंबाई टँक परिसरातील मध्यवर्ती चौकात घडली. अक्षय रविंद्र यादव (वय २५,  रा. रविवार पेठ, कोल्हापूर) असे जखमी हॉटेल व्यावसायिकाचे नाव असून त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.   या हल्ल्यानंतर संशयितांनी जखमी अक्षयची सोनसाखळी आणि ८ हजारांची रोख रक्कम लांबविल्याचे समजते.

पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, अंबाई टँक परिसरातील मध्यवर्ती चौकात जखमी अक्षय यादव यांचे रेस्टॉरंट आहे. या परिसरात हॉटेल व्यवसाय करायचा असेल, तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत  ३ फाळकूटदादांनी त्याच्याकडे वारंवार  खंडणीची मागणी केली जात होती. मात्र, अक्षयने पैसे देण्यास नकार दिला होता. तर शुक्रवारी रात्री तिघा संशयित तरुणांनी मद्यधुंद अवस्थेत अक्षयकडे जाऊन पैसे दिले नाही, तर येथे व्यवसाय करु देणार नाही. त्याचबरोबर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती. दरम्यान आज दुपारी तिघे संशयित थेट रेस्टॉरंटमध्ये तलवार घेवून घुसले. आणि अक्षयवर तलवार हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.  त्यानंतर  संशयित तेथून पसारा झाले असून  त्यांच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आली आहेत.