सांगली (प्रतिनिधी) : केंद्र सरकाच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आज (सोमवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली ते कोल्हापूर अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. सांगलीमधील विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ट्रॅक्टर मोर्चाला सुरूवात करण्यात आली.

माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सांगली ते कोल्हापूर या मार्गावरून काढण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा ट्रॅक्टरवर लावून तिन्ही शेतकरी कायदे मागे घेण्याच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, कृषी कायद्याविरोधात देशव्यापी शेतकरी आंदोलन सुरू आहे. परंतु विरोधी पक्षाची म्हणावी तशी साथ मिळत नाही. बड्या भांडवलदारांच्या भीतीमुळे विरोधक या आंदोलनाला साथ देत नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.