कोल्हापूर (प्रतिनिधी)  : करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील राजवर्धन पाटील यांच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या मृतदेहाच्या डोक्यामागे झालेल्या जखमेवरून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही महिला कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेत असून, आरती अनंत सामंत (वय ४५) असे तिचे नाव असल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले.

यावेळी संबधित शेतकऱ्याने पोलीस पाटील सुरेश पाटील यांना महिलेचा मृतदेह आढळल्याबाबत माहिती दिली. नंतर सुरेश पाटील यांनी फोनवरून करवीर पोलीस ठाण्याला वर्दी दिली. घटनास्थळ महिलेचे चप्पल, मृतदेहाच्या डोक्याच्या खाली आढळलेली रक्ताने माखलेली अर्धी वीट, खांद्यावर लटकलेली पर्स सापडली. या महिलेचा खून किंवा घातपात झाला असल्याचा अंदाज करवीर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत महिलेच्या पर्समध्ये सापडलेले आधार कार्ड व रस्त्यावर लावलेली गाडी (MH 09-F 7764) यावरून या महिलेचे नाव आरती सामंत असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून मोबाईलद्वारे त्यांच्या नातेवाइकांना कल्पना देण्यात आली. ही महिला विवाहित असून, ती कोल्हापूर येथील शुक्रवार पेठेत भावाच्या घरी राहत असल्याचे त्यांच्या भावाकडून पोलिसांना सांगण्यात आले.

आरतीचे भाऊ शिर्डी येथे देव दर्शनाला गेले असल्यामुळे त्यांच्या पत्नीने येऊन मृतदेह पाहिला आणि हा मृतदेह आरती सामंत यांचाच असल्याची खात्री पटली. मृतदेहाचे शवविच्छेदन सीपीआर येथे करण्यात आले. प्रथमदर्शनी महिलेचा खून झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत असला तरी शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे करवीर पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सूरज बनसोडे व सहकारी करत आहेत.