मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकऱणी सीबीआयने तपास सुरू करून आता पाच महिने झाले आहेत. पण त्याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या मुद्यावरून अनेक राजकीय वादविवाद झाले.  सुशांतची हत्या झाल्याचा आरोपही झाला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे दिली होती. मात्र, सीबीआयकडून यावर अदयाप कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यावरून देशमुख यांनी सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, सुशांत सिंहने १४ जून २०२० रोजी मुंबईतील वांद्रे परिसरातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत हत्या असल्याचेही म्हटले होते. या प्रकरणाची सुरूवातीला मुंबई पोलीस चौकशी करत होते. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र, अद्यापही सुशांतच्या मृत्यूचे खरे कारण पुढे आलेले नाही.