मुंबई (प्रतिनिधी) :  देशात आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असे विधान केल्याप्रकऱणी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल, तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

राऊत म्हणाले की, जर आपल्या देशात बाहेरची शक्ती  अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील, तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे विधान राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना फार गांभीर्याने घेत आहे. तसेच या विधानाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.