नवी दिल्ली : केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर भाषण करतना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली, मग कसं सहन करायचं?, मोदी सरकारला काहीच वाटत नाही?, त्या भारताच्या मुली नाहीत का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
भाजपाने ९ वर्षांत ९ सरकारं पाडली. भाजपाच्या काळात महागाई वाढली. महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी झालं. मोदी सरकारच्या काळात दुध महागलं. जगातील अनेक यादीत भारताची घसरण झाली. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारचं सर्वांत मोठं अपयश असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. वंदे भारत ट्रेन गरिबांसाठी नाही. मी वंदे भारतच्या विरोधात नाही, मात्र हे सत्य नाकारता येणार नाही. माझ्या मतदारसंघात एकही स्थानकावर वंदे भारत थांबवत नाही. वंदे भारत केवळ पाहता येते, प्रवास करणं अशक्य असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, राहुल गांधींच्या जागी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू केली तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.मणिपूरला फटका बसला तर भारतालाही फटका बसतो. आम्ही फक्त मणिपूरबद्दल बोलत नाही. संपूर्ण भारताबद्दल बोलतो. या दु:खाच्या काळात संपूर्ण देश मणिपूरच्या पाठीशी आहे, असा संदेश यावा, अशी आमची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मौन व्रत घेतले. ते लोकसभेतही काही बोलणार नाहीत आणि राज्यसभेतही काही बोलणार नाहीत. त्यामुळेच आम्हाला पंतप्रधान मोदींचं मौन व्रत अविश्वास ठरावाद्वारे तोडायचे आहे, असे गौरव गोगाई म्हणाले.