नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्याप्रकरणी जामिनावर सुटलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. रिपब्लिक टीव्हीवरील सर्व गुन्हे मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, त्याचबरोबर या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करावी, अशा मागण्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्या. चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याबद्दल स्पष्ट नकार दिला आहे. ही याचिकाही  फेटाळून लावण्यात आली आहे. तसंच रिपब्लिक टीव्हीवरील गुन्हे रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

गोस्वामी यांनी या याचिकेमध्ये सर्व एफआयआर रद्द करावे आणि महाराष्ट्र पोलिसांकडून संपादक आणि इतर कर्मचाऱ्यांना अटक होऊ नये, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी अनैसर्गिक असल्याचे सांगून सुनावणी करण्यास नकार दिला.