रायगड : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने रायगडावर नेते मंडळी जमली असतानाच अचानक शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यावर सोडून खासदार सुनील तटकरे निघून गेले. खाली उतरल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी ‘मी या भागाचे प्रतिनिधीत्व करूनही माझी संधी का डावलली गेली? असा सवाल करुन शिवराज्याभिषेक सोहळ्याचे राजकीयकरण केल्याचा आरोपही केला आहे. खा. सुनील तटकरे या शिवराज्याभिषेक सोहळ्यावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या विधींनंतरचा कार्यक्रम राजकीय होता, असे सुनील तटकरेंचे म्हणणे आहे. ते म्हणाले, ‘रायगडावर आज मी एक शिवभक्त नागरिक म्हणून येथे आलो होतो. शिवराज्याभिषेक सोहळा पूर्ण होईपर्यंत मी शिवभक्त मावळा म्हणून उपस्थित होतो. पण नंतरचा कार्यक्रम जरा राजकीय होता. मी या विभागाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतो. एक शिवभक्त म्हणून माझ्या भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्याची राजशिष्टाचारानुसार असणारी माझी संधी का डावलली गेली? मला माहिती नाही.’
सुनील तटकरे म्हणाले, मी कार्यक्रमाला हजेरी लावली; परंतु त्यापुढील कार्यक्रम राजकीय विचारांचा असेल असे समजून मी तिथून निघालो. एक शिवभक्त म्हणून तिथे झालेल्या ऐतिहासिक सोहळ्याला मी उपस्थित होतो. राज्य सरकारकडून होणाऱ्या कार्यक्रमांत एक राजशिष्टाचार असतो. पण आज माझ्यासाठी तो राजशिष्टाचार महत्त्वाचा नाही. कारण मी एक शिवभक्त मावळा म्हणून येथे उपस्थित होतो.