जयसिंगपूर (प्रतिनिधी) : यंदाची १९ वी ऊस परिषद कोणत्याही परिस्थितीत घेणारच असून ऊस परिषदेत दराचा निर्णय झाल्याशिवाय साखर कारखानदारांनी धुराडे पेटवू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. ऊस परिषदेची तारीख नंतर जाहीर करू, असेही ते म्हणाले.

चालू वर्षीच्या उस गळीत हंगामाचा बिगुल वाजू लागला आहे. या पार्श्वभुमीवर चालू वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणा-या ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शिरोळ येथील राजू शेटटी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.

यावेळी राजू शेटटी म्हणाले की, येत्या आठवड्याभरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी गावोगावी सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन ऊस परिषदेची तयारी करावी. तसेच सदर गावबैठकीमध्ये साखर कारखान्याकडून तीन टप्यात एफआरपी देण्याबाबत शेतकऱ्यांवर दबाव टाकून सह्या घेतल्या असल्याने सर्व कार्यकर्त्यांनी  संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरक्कमी एफआरपी मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन केले. सध्या सरकारने सिनेमाग्रह, हॉटेल, रेस्टॉरंट यांना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभुमीवर सरकारने ऊस परिषदेला परवानगी द्यावी,  अशी मागणी राजू शेटटी यांनी केली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष सावकर मादनाईक, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, स्वाभिनानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, वैभव कांबळे, आण्णासो चौगुले , आदिनाथ हेमगीरे , मिलींद साखरपे,अजित पोवार, राम शिंदे, शैलेश आडके, यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.