गारगोटी (प्रतिनिधी) : राज्य पातळीवरील खरीप हंगामातील पीक स्पर्धेत भात आणि सोयाबीन गटाच्या पीक स्पर्धेत कोल्हापूरच्या शेतकऱ्याने बाजी मारली आहे. या दोन्ही गटांमध्ये राज्यात पहिल्या तीन क्रमांकाची बक्षिसे कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी पटकावली आहेत.

राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या खरीप हंगाम राज्यपातळी भात आणि सोयाबीन २०२०-२०२१ पिक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये भात पीक स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक कृष्णात महादेव जरक (रा. म्हसवे ता. भुदरगड) यांनी मिळवला. त्यांनी ९० क्विंटल १८ किलो इतके उत्पादन घेतले. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी भात आणि सोयाबीन पीक स्पर्धा घेतली जाते. यामध्ये कोल्हापूरातून शेतकरी सहभागी होत असतात. जिल्हा पातळीवर पहिल्या पाच क्रमांकाच्या शेतकऱ्यांची नावे राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी पाठविले जातात. दहा गुंठे क्षेत्रातील पिकांची कापणी मळणी झाल्यानंतर सुकवण्याच्या वजनावर आधारित निकाल जाहीर केला जातो.

या शेतकऱ्यांचे तालुका कृषी अधिकारी नितीन भांडवले, मंडळ कृषी अधिकारी गारगोटी ओमकार करळे, कृषी पर्यक्षक पांडूरंग पाटील, स्वप्निल येरावाड, सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने अभिनंदन केले.