पुणे (प्रतिनिधी) : विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमधील स्थगित असलेल्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत. देशातील सद्यकालीन राजकीय प्रवाह एका स्थित्यंतरातून जात आहे. अशा परिस्थितीत राजकीय पटलावरील भावी युवा नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय छात्र संसद महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल, अशी अपेक्षा केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. प्रा. बघेल यांच्या या वक्तव्याला उपस्थित हजारो विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद देत त्यांच्या विधानाचे स्वागत केले.

भारतीय छात्र  संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कैलासवादिवू सिवन,  पर्यावरण अभ्यासक पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी, जे.के. उद्योग समूहाचे सीईओ अनंत सिंघानिया व शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती हे अतिथी म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, मिटसॉगचे संस्थापक राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, पंडित वसंतराव गाडगीळ व मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन  हे उपस्थित होते.

के. सिवन म्हणाले, अंतराळ संशोधन आणि विज्ञान तंत्रज्ञान हे फक्त रॉकेट, क्षेपणास्त्रे, उपग्रह प्रक्षेपकांच्या निर्मितीपुरते मर्यादित नाही. या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला होणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. अंतराळ संशोधनातील नव्या शोधांमुळे आता आपल्याला वादळे, नैसर्गिक आपत्ती यांची पूर्वसूचना देणे शक्य होत आहे, ज्यामुळे मनुष्य आणि वित्तहानी टाळता येणे शक्य झाले आहे. मच्छीमार आणि शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेणे शक्य झाले आहे.

अनंत सिंघानिया म्हणाले, आगामी काळात लवकरच कल्पनातीत अशी तंत्रज्ञानक्रांती घडून येणार आहे. अशा काळात विद्यार्थ्यांनी नवे मार्ग, नव्या वाटा, नव्या दिशांचा ध्यास घेतला पाहिजे. प्रगती, यश यांच्या नव्या व्याख्या समजून घेतल्या पाहिजेत. डॉ. अनिल प्रकाश जोशी म्हणाले, आज आपण पर्यावरणीय संकटातून जात आहोत. पर्यावरणाचे संवेदनशील मुद्दे अधोरेखित करण्यासाठी आम्ही मुंबई ते उत्तराखंड अशी सायकल रॅली काढत आहोत. समाजमनात पर्यावरणाविषयी जाणीवजागृत निर्माण करण्याचा उद्देश यामागे आहे. प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड  म्हणाले, स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व, या त्रिसूत्रीचा विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा आणि आपल्या परंपरेने दिलेले तत्त्वज्ञानाचे, अध्यात्माचे संचित डोळसपणे अभ्यासावे.