कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सुरक्षेची पाहणी केली. पोलीस विभागाने यापुढील काळात ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काटेकोरपणे बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार, सचिव शिवराज नाईकवाडी, पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण व अन्य अधिकारी उपस्थित होते.

गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई यांनी श्री महालक्ष्मी दर्शनासाठी आवश्यक असलेल्या ई-पाससह अन्य शासकीय नियमांचे पालन करून आई महालक्ष्मीचे दर्शन घेतले. मागील दीड- दोन वर्षांपासून राज्यावर व जगावर कोरोनाचे संकट आलेले असून ते संकट दूर करून राज्याची आर्थिक सुबत्तेत वाढ व्हावी. तसेच सर्व नागरिक सुखी व समाधानी राहावेत, यासाठी आई महालक्ष्मीकडे प्रार्थना केली.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी दर्शनासाठी ई- पासची व्यवस्था केली आहे. त्या माध्यमातून भाविकांना दर्शनाची निश्चित वेळ दिली जात असल्याने भाविक ही दर्शनासाठी स्लॉट प्रमाणे येत आहेत. त्यामुळे भाविकांचेही दर्शन कमी वेळेत होत असल्याचे सांगितले.