इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरात भटक्या श्वानांनी धुमाकूळ घातला आहे. आज (सोमवार) शहरातील लायकर गल्ली, धान्य ओळ या परिसरात भटक्या श्वानांनी शारदा फाटक, स्वप्नाली गोलंगडे आणि सुभाष माने यांच्यावर हल्ला करुन जखमी केले. यांच्यावर आयजीएम, तर अन्य तिघांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इचलकरंजीमध्ये अनेक ठिकाणी भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून, यासंदर्भात विविध सामाजिक संघटनांनी यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. या मागणीबाबत संबंधित प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नाहीत. त्यामुळे हे प्रकार घडत आहेत.  दरम्यान, दोन वर्षांपूर्वी शहरातील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पालिका प्रशासनाने एका कंपनीला ८० लाखांचा ठेका दिला आहे.

तरीही भटक्या श्वानांची संख्या कमी होत नसून वाढतच चालली आहे. त्यामुळे आता या भटक्या श्वानांच्यामुळे इचलकरंजीतील नागरिकांना आता आपला जीव मुठीत घेवून वावरावे लागत आहे.