हिंगोली (प्रतिनिधी) : आम्हाला जयंत पाटलांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जयंत पाटलांनी आम्हाला खोटं ठरवण्याऐवजी मदत करावी. लोक अडचणीत आले आहेत, पण अजूनही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे बोलघेवडेपणा सोडा आणि कृती करा, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज (बुधवार) हिंगोली दौऱ्यावर आहेत. यावेळी वसमत येथील शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडल्या. त्यानंतर ते पत्रकरांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावू नये, सरकारने बँकांना आदेश द्यावेत.  सरकारमध्ये फक्त बोलणारे आहेत. सगळे मंत्री रोज माईक घेऊन मीडियासमोर येऊन बोलत आहेत. पण शेवटी पाहणार कोण आहे? निर्णय कोण घेणार आहे? सरकार निर्णय घेण्यासाठीच आहे. कोणताही निर्णय होताना दिसत नसून फक्त टोलवाटोलवी सुरु आहे. सरकारने शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. त्यांचा आक्रोश समजून तात्काळ निर्णय घ्या, असेही ते म्हणाले.