कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाचगांवमध्ये थकीत वीज बिल असलेल्या नागरीकांचे वीजचे कनेक्शन कट करण्यात येत आहे. सध्या दिवाळी सन तोंडावर असल्यामुळे ग्राहकांचे विज कनेक्शन तात्पुरते कट करण्याचे थांबविण्यात यावेत. तसेच वसुलीसाठी आपले कर्मचारी नागरीकांशी अरेरावी करीत आहेत ती थांबवावी. अन्यथा आंदोलनाचा इशारा पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंत्याना दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महावितरणचे लोक काही नागरीकांना वीज बीलासाठी आरेरावीची भाषा करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तिव्र संताप करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर ते आंदोलन देखील करणार आहेत. यासाठी पाचगांवचे प्रथम नागरीक म्हणून माझा पुर्ण पाठींबा असेल, तरी वीज बिलाच्या वसुलीसाठी नागरीकांबरोबर चांगली भाषा वापरावी. पाचगांवामध्ये बरेच सर्वसामान्य लोक राहत असल्याने एखादया कनेक्शन धारकाचे विज बिल थकीत असल्यास त्यांना पैसे भरण्यासाठी थोडी मुदत देण्यात यावी, थकीत वीज बिल टप्याटप्याने भरून घेवून जनतेला सहकार्य करावे.

आपल्याकडे कंत्राटी बेसवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी बऱ्याच लोकांकडून बिलापोटी रक्कम घेतलेली आहे. अशा ग्राहकाकडून घेतलेली रक्कम अदयाप बिलासाठी भरली गेली नसल्याने ग्राहकांचे बिल थकीत दिसत आहे. तरी याबाबत चौकशी करून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतलेली रक्कम बिलापोटी आपण जमा करून घ्यावी. अशा ग्राहकांचे बिज कनेक्शन कट करणे थांबवावे, तरी याबाबत आपण सहानभुतीपुर्वक विचार करून पाचगांव गावातील लोकांना सहकार्य करावे असे निवेदनात मागणी केली आहे.