मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील आझाद मैदानात शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या आवाजवी शालेय शुल्क विरोधात राज्यभरातील पालकांनी एकत्र येऊन आंदोलन केले. शाळांनी आपल्या मुलांना काढून टाकण्याच्या सतत धमकी दिल्यामुळे सर्व पालक तणावग्रस्त आहेत. जर शालेय शुल्क भरले नाही तर मुलांना ऑनलाइन क्लासमध्ये बसू दिले जाणार नाही. अशा पद्धतीच्या धमक्या वारंवार येत आहेत. दुसऱ्या टर्मची फी न भरल्यामुळे अनेक शाळांनी अनेक मुलांचे ऑनलाईन शिक्षणही बंद केले आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून अशा शाळांवर कडक कारवाई करावी, अशा पद्धतीची मागणी ‘फोरम फॉर फेअरनेस एज्युकेशन’ या संघटनेने केली आहे.

संघटनेचे प्रमुख जयंत जैन म्हणाले, मागील तीन महिन्यापासून विनाअनुदानित खाजगी शाळांचे पालक त्यांच्याकडून शाळांनी आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शालेय शुल्क विरोधात आंदोलने करत आहेत. याबाबत अनेक तक्रारी देखील शासनाकडे केल्या आहेत. परंतु तरीदेखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पालक भरत असलेल्या शालेय शुल्कचा निर्णय मागील वर्षी सामान्य शालेय शिक्षणासाठी घेण्यात आला होता. मार्च २०२० पासून टाळेबंदी झाल्यामुळे जानेवारी २०२१ पर्यंत कोणत्याही शाळा कार्यान्वित नव्हत्या. तरीदेखील राज्यभरातील अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांचे पूर्ण शुल्क वसूल करण्यात येत आहे. पण कमीत कमी ४० ते ५० टक्के फी दरामध्ये सवलत द्यावी.