मुंबई  (प्रतिनिधी) : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे.  यावर उपाय म्हणून अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याबाबत विचार सुरु आहे, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना आखल्या आहेत. उपाययोजना जरी सुरु असल्या, तरी त्याचा रिझल्ट काय येईल, हे सध्या तरी सांगता येणार नाही. महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असे आपल्याला म्हणता येईल. परंतु  आताच्या स्थितीत लॉकडाऊन कुणालाही परवडणारा  नाही, अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. पण रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. राज्यातील काही शहरात कडक निर्बंध लावावे लागत आहेत. मुंबईमध्ये लोकल सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात  गर्दी होऊ लागली आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.