कोल्हापूर (प्रतिनिधी) : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यात ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या परिपूर्ण विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी ९ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर केला. परंतु, रंकाळा तलाव सुशोभिकरण प्रकल्प खर्चाचा राज्य शासन व महानगरपालिका यांचा ७५-२५ असा हिस्सा अशी अट शासन निर्णयात नमूद करण्यात आली होती.

त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक परिस्थिती पाहता या प्रकल्पातील २५ टक्के खर्च पालिकेच्या आवाक्याबाहेरील आहे. त्यामुळे  जूर झालेल्या ९ कोटी ८४ लाखांच्या निधीचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाने द्यावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आता राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणास मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील निधीचा १०० टक्के हिस्सा राज्य शासन देण्यास मंजुरी मिळाली आहे.

राजेश क्षीरसागर यांनी, महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक स्थिती दयनीय असल्याने महापालिकेचा हिस्सा देण्यास महापालिका प्रशासन असमर्थ आहे. अशा परिस्थितीत ऐतिहासिक रंकाळा तलावाचे सुशोभिकरणाचा प्रश्न प्रलंबित राहू नये. यासाठी नगरविकास मंत्री महोदयांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. याला यश प्राप्त झाले असून या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील मंजूर निधीचा १०० टक्के हिस्सा राज्य शासन देणार आहे. यासह दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित रु.५ कोटींचा निधीही तात्काळ मंजूर करून त्यातही १०० टक्के हिस्सा राज्य शासनाकडून देण्याकरिता पुढील काळात पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, रविभाऊ चौगुले, दीपक गौड, राजू हुंबे, अभिषेक देवणे, कमलाकर किलकीले, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.