मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपालांच्या  १२ पानांच्या भाषणात कुठेही यशोगाथा दिसत नाही,  तर वेदना आणि व्यथाच दिसतात. आपली बाजू मांडत असताना त्यात काही आकडेवारी मांडली पाहिजे, पण कुठेच दिसत नाही. जसं आपण चौकात भाषण करतो, तसेच भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवले,  अशी घणाघाती टीका  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली. ते विधानसभेत बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, राज्यपाल तिथे गेले, विमानात इंधन भरलेलं होतं. मग परवानगी नसताना इंधन कसं भरलं?  परवानगी नसताना त्यांना बोर्डिंग पास कसा मिळाला? ते आतमध्ये जाऊन विमानात कसे बसले? राज्यपाल आणि आपल्यात मतभेद असतील, पण मनाचा इतका कोटेपणा दाखवू नये. राज्यपाल व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं नाही तर पद महत्वाचं असतं. आपल्या प्रोटोकॉलमध्ये राज्यपाल पहिल्या क्रमांकावर आहेत. मुख्यमंत्री आणि राज्यपाला यांच्यात कोणाला विमान द्यायचं अशी वेळ आली तर राज्यापलांना द्यायचं असतं, असे फडणवीस  म्हणाले. अशाप्रकारे रोज आपण ज्या राज्यपालांना अपमानित करता आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आलाय याचं समाधान वाटतं, असेही ते म्हणाले.