कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका मांडत नाही. महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाची थट्टा करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी पूर्णपणे अयशस्वी ठरली असल्याची टीका भाजपचे जिल्हा (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज (बुधवार) केली.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या याचिकेवर आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी झाली. घटनापीठाने आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. तसेच याबाबत पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी होईल, असे सांगितले.

याबाबत समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यात सरकारला आपली बाजू मांडता आली नाही. सरकार मराठा समाजाची थट्टा करत आहे. न्यायालयात मराठा समाजाची भूमिका मांडण्यासाठी आमची तयारी आहे, हे वारंवार सांगणारे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे वाटतच नाही. सरकार मराठा समाजाची बाजू मांडू शकत नाही. शांत आणि संयमी आंदोलन करणाऱ्या मराठ्यांची भविष्यात सरकारविरूध्द आक्रोश, मोर्चे सुरु होतील. आता शांत असणारा मराठा आता तीव्रतेने सरकारविरूध्द आक्रोश करेल, असा इशाराही घाटगे यांनी दिला.