कडगाव (प्रतिनिधी) :  भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु प्रकल्प फुटल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस वाहून गेला आहे.  त्यामुळे  शिल्लक राहिलेल्या उसाचे वेळेत  गाळप होणे गरजेचे आहे.  त्यासाठी चालू गळीत हंगामात बिद्री साखर कारखान्याने   पहिल्यांदा नुकसानग्रस्त भागातील ऊसतोडणी व वाहतूक कार्यक्रम  सुरु करावा, अशा मागणीचे निवेदन  सभापती सत्यजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांना आज (मंगळवार) दिले.

बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात  येत असलेला मेघोली लघु प्रकल्प फुटल्याने  मेघोली, तळकरवाडी, नवले,  ममदापूर, वेंगरुळ येथील  शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके वाहून गेली आहेत. तर शेतजमिनीचे ही मोठे नुकसान झाले आहे. तर काही क्षेत्रात ऊस तरून राहिलेला आहे. या उसाचे गाळप वेळेत होणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. तरी कारखान्याने उसाचे गाळप लवकर करण्यासाठी नियोजन करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी कुंडलीक तळकर, सुरेश हवालदार, सदाशिव गुरव, अशोक पाटील, रविंद्र देसाई, अशोक सावंत, विलास देसाई, रविंद्र राऊळ, जयवंत देसाई, संतोष तळकर, आनंदा शिंदे, नंदकुमार सावंत, जयवंत पिळणकर, सयाजी पाटील, अतुल जाधव, युवराज पाटील, रवी देसाई, प्रकाश खेतल, शहाजी देसाई आदीसह नुकसानग्रस्त शेतकरी, सभासद उपस्थित होते.