साळवण (प्रतिनिधी) : संपूर्ण राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यालाही ढगफुटी सदृष्य पावसाने अक्षरशा झोडपून काढले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गगनबावडा तालुक्याला पावसाचे प्रमाण असते. यावेळी अतिवृष्टीने कुंभी नदीने रौद्ररूप धारण केले त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले व पुरस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील अनेकांच्या घरात पाणी शिरून प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले याचवेळी पूरस्थिती आटोक्यात आल्यानंतर गगनबावडा सहाय्यक पोलिस निरिक्षक रणजीत पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला.

पोलिस हे कायम चोख कर्तव्य बजावतात. प्रत्येकवेळी कर्तव्य तत्पर असलेल्या लाखो पोलिसांमध्ये एखादा दुसरा वाईट कृत्य करतो अन सर्वांना त्याच चष्म्यातून पाहिले जाते. परंतु रणजीत पाटील यांनी कोरोणा काळामध्येही ३०० ते ४०० कुटुंबांना मिशन संवेदना अंतर्गत मदत केली आहे. आताही पुरस्थितीमध्येही ज्या घरात पाणी शिरले अशा असळज येथील २९ तर शेणवडे येथील ७ कुटुंबांना स्वतःच्या प्रयत्नातून दानशूर व्यक्तिंकडून ब्लांकेट व बिस्कीट पुढे वाटप केले. एरव्ही पोलिस म्हटल की कायदा,  दरारा व धाक असणारे कर्तव्यदक्ष पोलिस यावेळी मात्र समाजसेवकांच्या रूपात दिसून आले. यांच्या समाजसेवेमुळे त्यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा होवू लागली.