सिंधूदुर्ग (प्रतिनिधी) : भाजप नेते व माजी खा. किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरूद्ध तक्रार दिल्यानंतर फिरण्याची काय गरज आहे ? असा सवाल गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सिंधुदूर्गमध्ये माध्यमांशी बोलताना केला. ते सर्वत्र फिरत आहेत, याचाच अर्थ त्यांचा हा स्टंटबाज असून सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणून बदनामी करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे ना. पाटील यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढे येऊन उघडपणे सांगावे की, आम्हीच सोमय्यांना हे सर्व करायला लावतोय. म्हणजे महाराष्ट्रालाही कळेल की सुडबुध्दीचे राजकारण काय असते, असे ना. पाटील म्हणाले.