नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावर मात करायची असेल, तर आपल्याला असमानता नष्ट करावी लागेल. जर आपण आपल्यातील असमानता नष्ट केली, तर आपण हे कोरोनाचं संकट देखील नष्ट करू शकू. आपण करोना साथीच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत असताना मला विश्वास वाटतोय की आपण याच वर्षी कोरोनाला संपवू शकतो,  पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे  प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम यांनी  पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

डॉ. टेड्रॉस अधानोम म्हणाले की, आज आपल्याकडे कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. तसेच,  उपचार करण्यासाठी देखील औषधं हाती आहेत. मात्र, जगात जितकी जास्त असमानता असेल, तेवढा हा विषाणू आपण कल्पनाही करू शकणार नाही किंवा बचाव करू शकणार नाही अशा पद्धतीने घातक होऊ शकतो.

त्यासाठी कोरोनाला पराभूत करायचे असेल, तर प्रत्येक देशातील किमान ७० टक्के लोकसंख्या पूर्ण लसीकृत असायला हवी.  यासाठी सगळ्यांनी एकत्रपणे काम करून हे जागतिक लक्ष्य साधायला हवं. २०२२ च्या मध्यापर्यंत हे लक्ष्य आपण सगळ्यांनी मिळून साध्य केल्यास कोरोनाचे संकट संपवू शकतो, असेही  ते म्हणाले.