मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मनसुख हिरेन, अंबानी स्फोटकं प्रकरण यावर सवाल उपस्थित करत  ‘सामना’च्या रोखठोक सदरातून भाष्य केले आहे. पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात. हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, असा सुचक इशाराही राऊत यांनी दिला आहे.

मनसुख प्रकरणावर मुंबई पोलिसांच्या तपासावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात. पोलिसांचे मनोधैर्यच नष्ट करतात. हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असतो. या दबावातूनच पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात. हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, पण सगळ्यांनाच पाण्यात राहायचे आहे. माशाशी वैर का करायचे असे सगळ्यानाच वाटू लागले तर राज्याचा प्रवाह गढूळ होईल, अशी चिंता राऊत यांनी व्यक्त केली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात पोलिसांनी तोंड काळे केले, असा आरोप विरोधी पक्षनेते करीत असतील, तर अन्वय नाईक प्रकरणात कोणी तोंड काळे केले व हा कोळसा पोलिसांना पुरवणारे कोण होते?, असेही राऊत यांनी म्हटले आहे.