मुंबई (प्रतिनिधी) : राज्य विधीमंडळाचे अधिवेशन आलं की कोरोना होतो. हा विरोधी पक्षाचा आरोप चुकीचा आहे. त्यांना जर एवढंच वाटतंय तर त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेत्यांना दिले. ते मुंबईत आज (शुक्रवार) पत्रकारांशी  बोलत होते.

अधिवेशन जवळ आले की, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोरोना कसा काय होतो ? असा सवाल करून विरोधी पक्ष भाजपने सरकारवर निशाणा साधला होता. यावर मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य करत भाजप नेत्यांवर तोफ डागली.  पूजा चव्हाण प्रकरणाची मुख्यमंत्री आणि पोलिसांनी सखोल चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे. कोणत्याही चौकशी शिवाय कारवाई करणे चुकीचे होईल. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणात भाजपची कशी फजिती झाली, ते आपण पाहिले आहे, असे सांगून  संजय राठोडांच्या राजीनाम्याबाबत मला अधिक माहिती नाही. मात्र, मुख्यमंत्री महोदयांच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.