मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल, तर येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत नियोजन करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) येथे झालेल्या बैठकीत दिल्या.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स, डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.  

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे. अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधे, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.