नवी मुंबई (प्रतिनिधी) : तुमच्यासारखे नेते पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवला नाही, की मी मुख्यमंत्री नाही, मला असं वाटतंय की मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कोणत्या पदावर आहे, ते महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

बेलापूर येथे मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, गेली दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिले नाही, की आता मी मुख्यमंत्री नाही, विरोधी पक्ष नेता म्हणून मी उत्तम काम करत आहे, आणि ज्या दिवशी आशिर्वाद मिळेल, त्या दिवशी पहिल्यांदाच येथील गोवर्धनी मातेकडेच येणार आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याचे कारण नाही.