वाराणसी (वृत्तसंस्था) : नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणे, प्रश्न समजावून घेणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे कर्तृव्य असते. परंतु, या कामाचा विसर पडला. तर जागरूक नागरिक काय करू शकतात, याचा वाईट अनुभव एका नगरसेवकाला आला. समस्या न सोडवल्यामुळे नागरिकांनी नगरसेवकाला थेट गटाराच्या पाण्यात बांधून ठेवल्याची घटना वाराणसीच्या बलुवाबीरमधून समोर आली आहे.

वाराणसीच्या बलुवाबीरमधील नगरसेवक तुफैल अंसारी काम करत नसल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांना खुर्चीवर दोरीने बांधत थेट गटाराच्या पाण्यात बसवले.  गेल्या अनेक दिवसांपासून गटार आणि दूषित पाण्याच्या समस्येची तक्रार घेऊन  नागरिक या नगरसेवकाकडे जात होते. मात्र, सातत्याने याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आक्रमक झालेल्या नागरिकांनी त्यांना चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

अनेक दिवसांपासून गटारातील पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता. मात्र, नगरसेवकाने या प्रश्नाकडे कानाडोळा केला होता. अखेर संतप्त झालेल्या नागरिकांनी त्यांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यात नगरसेवकाला दोरीने खुर्चीवर बांधून बसवले. दरम्यान, या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.