मुंबई (प्रतिनिधी) : फडणवीस सरकारमधील भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणले होते. पाच वर्षांत भाजपने केलेले काळे कारनामे आम्हाला पूर्णपणे माहित आहेत. त्यामुळे आम्ही तोंड उघडले, तर भाजपाची पळता भुई थोडी होईल. योग्य वेळी ते होईलच! त्या वेळेची वाट पहावी, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला दिला आहे.

सावंत यांनी पुढे म्हटले आहे की, भाजपची सत्तेच्या हव्यासापोटी सुरू असलेली थेरं आम्ही पाहत आहोत. संवैधानिक पदांचा दुरुपयोग व संवैधानिक मर्यादांचे उल्लंघन केले जात आहे. यावर आमचं लक्ष आहे. भाजपच्या षड्‌यंत्राची आम्हाला माहिती आहे. 

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याचबरोबर काँग्रेस अस्तित्वहीन झाला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये झालेल्या भ्रष्टाचारात काँग्रेसचा हिस्सा किती ? असा सवाल करत फडणवीस यांना काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावर   काँग्रेसने प्रत्युत्तर दिले असून आम्ही तोंड उघडले तर भाजपची पळता भुई थोडी होईल, असा इशारा दिला आहे.