कोल्हापूर (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील तिसंगीपैकी पूरग्रस्त टेकवाडी गावचे पुर्नवसन करण्यात यावे. या मागणीसाठी वारंवार शासनाला निवेदन दिली असून आंदोलने ही करण्यात आले आहे. मात्र, यावर प्रशासनाकडून योग्य कार्यवाही झाली नसल्यामुळे आज (मंगळवार) टेकवाडी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी आमचं ठरलय पुनर्वसन उरलय, टेकवाडीच पुनर्वसन झालेच पाहिजे अशी घोषणांबाजीही करण्यात आली. महापुरात टेकवाडी गावला बेटाचे स्वरूप प्राप्त होवून इतर गावांशी संपर्क तुटतो. त्यामुळे पूराचा सामना येथील नागरिकांना दरवर्षी करावा लागतो. तसेच गावच्या पश्चिम दिशेला मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत असून गावचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून पुनर्वसनासाठी योग्य कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात सर्जेराव खाडे, पांडुरंग खाडे, संजय खाडे, प्रकाश खाडे, पूजा खाडे, कोमल खाडे, शहाजी गायकवाड, टेकवाडीचे ग्रामस्थ सहभागी झाले होते.