इचलकरंजी (प्रतिनिधी) : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंची निवड झाली आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इचलकरंजीतील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजच्यावतीने स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड आणि ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन हरिष बोहरा यांच्या हस्ते करण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यातील राही सरनोबत, तेजस्विनी सावंत आणि स्वरुप उनाळकर या तीन खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या खेळाडूंनी स्पर्धेत यश संपादन करुन देशाचा नावलौकिक उंचवावा यासाठी ही मोहिम राबविण्यात आली. यावेळी या खेळाडूंचे छायाचित्र असलेल्या फलकावर विविध मान्यवरांसह जवळपास २५० जणांनी स्वाक्षर्‍या केल्या.

यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर, उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक एस. एस. भस्मे, व्ही. एन. कांबळे, शेखर शहा, शिक्षक, कर्मचारी, खेळाडू उपस्थित होते.